कापूस दरवाढीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश
कारंजा (घा)येथे कापसाच्या दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी काढला बैलबंडी मोर्चा
हजारो च्या संख्येत शेतकऱ्यांचा सहभाग
कारंजा (घा)युवा संगम ऑनलाईन न्यूज दिं-21मार्च 2023
कपाशीचे दर वाढण्याऐवजी सातत्याने कमी होत असल्याने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी कारंजात बैलबंडी मोर्चा काढत आक्रोश केला. शेतकऱ्यांसह अनेक महिलाही या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. आठ हजारांवर काहीसे स्थिरावलेले कापसाचे दर सुमारे सातशे- आठशे रुपयांनी कमी झाले आहेत.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी आपले पीक गमावले असताना आता शेतकऱ्यांची भिस्त कपाशीवर होती. कपाशीला भाव मिळेल अशी अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी घरात राखून ठेवला. पण, भाव वाढण्याऐवजी गडगडले आहेत. सोयाबीन, हरभऱ्याचीही स्थिती याहून वेगळी नाही. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. यावरून संतापलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र
येत सामाजिक कार्यकर्ते जयकुमार बेलखेडे यांच्या नेतृत्त्वात आक्रोश मोर्चा काढला. जयस्तंभ चौकापासून बैलबंडीवरून निघालेल्या शेतकऱ्यांनी मेन रोड दिशेने मार्गक्रमण सुरू केले. वाटेत घोषणाबाजी होत असल्याने वातावरण तापले. बैलबंडीवर बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात तिरंगा असल्याने शहरातील प्रत्येकाचे लक्ष वेधले गेले. तहसीलवर मोर्चा धडकल्यानंतर शेतकऱ्यांनी निवेदन देत हा कापूस कुठे न्यायचा, असा सवाल केला. कापसापासून तयार होणाऱ्या कपड्यांचे दर कधी कोसळत नाहीत. मग कपाशीचे दर कसे कोसळतात, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते जयकुमार बेळखडे यांनी केला आहे.मोर्च्यात कापूस दरवाढी करिता हजारो शेतकरी व महिला सहभागी झाले होते.