कारंजा घा
युवा संगम न्यूज 14/10/2025
संघ शंभर वर्षाचा झालेला आहे,शंभर वर्षे होणे म्हणजे हा नैसर्गिक प्रवास असतो,ज्यावेळी आपण संघाचा विचार करतो तेव्हा संघाचे एक वैशिष्ट्य आहे संघ हा वर्धिष्णू आहे,१९२५ ला विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मोहिते संघस्थानावर नागपूरला संघाची पहिली शाखा लागली होती आणि आज संघाच्या ८४००० शाखा आहे.पंचावन्न देशामध्ये संघाच्या शाखा लागतात,१२५ देशामध्ये संघाचा संपर्क आहे आज संघ हा एक वटवृक्ष झालेला आहे,संघ हा स्वयंसेवकांच्या परिश्रमाने व तपश्चर्याने मोठा झालेला आहे असे डॉ.प्रा.सुभाषजी लोहे(आष्टी)संयोजक,संत विमर्श महाराष्ट्र राज्य यांनी गुरुकुल पब्लिक स्कूल कारंजा च्या मैदानावर "विजयादशमी" उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना सांगितले.या उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून गजानन महाराज संस्थान कारंजा येथील अध्यक्ष उमेशजी पायघन होते तर व्यासपीठावर रामटेक विभाग संघचालक श्री.जयंतरावजी मूलमुले व कारंजा खंड संघचालक सुनीलजी कडू उपस्थित होते.
डॉ.प्रा.लोहे म्हणाले समाजाचे मनोबल टिकविण्याचे कार्य आपल्या संतांनी केलेले आहे,ज्ञानेश्वर माउलींनी आळंदी ते पंढरपूर वारी काढली, सगळ्या लोकांना एकत्र केले आणि माध्यम होते ते फक्त परमेश्वराची भक्ती.या परमेश्वर भक्तीच्या आधारावर संपूर्ण समाजाला एकत्र केले.ज्यावेळी ब्रिटिशांचे साम्राज्य होते तेव्हा सुद्धा एकोणिसाव्या शतकाच्या मध्यामध्ये आध्यात्मिक चेतना निर्माण केली.स्वामी दयानंद स्वरस्वती,रामकृष्ण परमहंस,स्वामी विवेकानंद,रवींद्रनाथ टागोर या मंडळींनी आध्यात्मिक चेतना निर्माण केली आणि पुढे या बाबींचा उपयोग सुद्धा झाला.
हिंदू समाज आपला स्व विसरत होता आपले वंदे मातरम चे जे गीत आहे याचेही विभाजन झाले.या सर्व परिस्थितीचे जेंव्हा डॉ.हेडगेवार अवलोकन करतात आणि मग त्यांना वाटते की या समाजाचे मला संघटन करायचे आहे आणि हरवलेला स्व प्राप्त करून घ्यायचे आहे यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि सांगितले की हे हिंदू राष्ट्र आहे अशी गर्जना डॉ. हेडगेवार यांनी केली.
संघाचा शंभर वर्षाचा इतिहास जर आपण बघितला तर सुरवातीच्या कालखंडामध्ये फार छोटं असं संघटन होते पण डॉ हेडगेवार यांच्या संपार्कमध्ये ज्या ज्या व्यक्ती आल्या त्या संघाच्याच बनल्या.त्यांनी आपल्या घराकडे दुर्लक्ष केले आणि त्या कालखंडामध्ये ते प्रचारक म्हणून निघाले.१९४० ला डॉ हेडगेवार यांचे निधन झाले त्यावेळी संघाला केवळ १५ वर्ष झालेली होती.आज शंभर वर्षाच्या या कालखंडामध्ये संघ संपूर्ण भारतात पसरलेला आहे आणि संघ देशव्यापी बनलेला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरवातीपासूनच श्री राम मंदिर आयोजनात पूर्णपणे सहभागी होता.श्रीराम मंदिराचे आंदोलन पाचशे वर्षांपासून सुरू होते.तीस वर्षापर्यंत विश्व हिंदू परिषदेने आंदोलनाचे नेतृत्व केले आणि संपूर्ण समाज या आंदोलनासोबत उभा राहिला.या हिंदू समाजाचा स्व व या राष्ट्राची ओळख पुन्हा पक्की व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झाले. श्री रामललाची स्थापना झाली आणि हे केवळ राम मंदिर नसून हे एक राष्ट्र मंदिर आहे.राम मंदिराची प्राण प्रतिष्टा म्हणजे स्व ची प्रतिस्थापना होती असे डॉ प्रा लोहे यांनी सांगितले.
उत्सवापूर्वी स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन निघाले.स्वयंसेवकांनी व्यायाम सांघिक गीत,योग,दंड व्यायाम योग व समतेचे प्रात्यक्षिक केले.प्रस्ताविक खंड कार्यवाह श्री.जयंतजी टावरी यांनी केले.सुभाषित श्रीजित भोकरे,अमृतवचन आशिष गांधी व वैयक्तिक गीत हेमंत मानमोडे यांनी केले.उत्सवाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.